Saturday, June 9, 2007

माझी भटकंती

भटकंती. हा शब्द तसा पूर्वीपासूनच परिचयाचा. मात्र हा शब्द माझ्या आयुष्याचा भाग बनून जाईल असे कधी वाटले नव्हते. माझ्या भटक्या आयुष्याची सुरूवात झाली मझ्या अभियांत्रीकीच्या तीसर्या वर्षी. तसं तर मी सुरूवात पेब या थोड्या कठिण गडापासून केली. मात्र खर्या अर्थाने मला आवड निर्माण झाली ती लोहगड या गडापासून. तत्पूर्वी सरसगड या गडाला पाहून मला चढायची इच्छा झाली होती. त्याबद्दल पुढे बोलेनच.
आजवर मी भेट दिलेल्या गडांविषयी थोडेसे सांगण्याचा हा प्रयत्न.

लोणावळ्याजवळ असणारा लोहगड पूर्वीपासून बोरघाटाचा रक्षक म्हणून कार्यरत होता. विंचू काटा ही नैसर्गिक माची, अभेद्य तटबंदी ही या गडाची वैशिष्ट्ये.. हा गड पुणे - मुंबई महामार्गावरून हमखास नजरेस पडतो.


लगतचा विसापूर किल्ला हा त्याच्या अखंड तटबंदीमूळे प्रसिद्ध आहे. मळवली स्थानकावरून समोर लोहगड नजरेस येतो. पण डोंगरामागे लपलेला विसापूर मात्र भजे गावात गेल्यावरच दिसून येतो. पूर्वीपासून दुर्लक्षित असा हा किल्ला इतिहासात फारसे स्थान मिळवू शकला नाही.


तिकोना हा गड प्रथमच trekking च्या उद्देशाने चढलो. हा छोटेखानी किल्ला तुंगच्या जोडीने पूर्वी checkpost प्रमाणे वापरला जायचा. हा गड नंतर प्रत्येक ऋतूत आणि दिवसाच्या प्रत्येक वेळी मी केला आहे. या गडावरून दिसनारे सौंदर्य अगदीच अवर्णनीय आहे. समोर पसरलेला पवना जलाशय आणि उत्तुंग असा तुंग ही जोडी सौंदर्याची अगदी लयलूट करते.


शेजारचा तुंग देखील मी एकदा चढलेलो आहे. इथून दिसणारी लोहगड-विसापूरची जोडगोळी व त्यांचे सौंदर्य शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य. किल्ल्याच्या नावावरून असे वाटते की हा गड चढायला खूप अवघड असेल. मात्र असे नाही आहे. हा छोटासा गड दोन तासात चढून व पाहुन होतो.


सुधागड हे भोर संस्थानचे वैभव. भोराईदेवीचे स्थान असल्यामुळे या गडाला भोरपगड असेही म्हटले जाते. झाडांमध्ये वसलेल्या या गडाचा विस्तार प्रचंड आहे. त्याचप्रमाणे गडावर होणारी निसर्गाची मुक्त उधळन ही एकदातरी अनुभवायलाच हवी. या गडाची तटबंदी आजही बर्याच प्रमाणात शाबूत आहे.


विद्येची देवता असलेल्या गणेशाच्या पाली या गावाला लागूनच उभ्या असलेल्या सरसगड या गडाला पाहून मला सर्वप्रथम trekking ची इच्छा झाली. पाली गावच्या दक्षिणोत्तर दिशेला या गडाची नैसर्गिक भिंत उभी आहे. या गडाचा वापर मुख्यत्वे टेहाळणीकरिता केला जात असे.


"गडांचा राजा व राजांचा गड" असा उल्लेख राजगड या गडाविषयी केला जातो. बुलंद, बेलाग व बळ्कट राजगड आजही आपल्या हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्यापासून ४८ किमी अंतरावर नीरा - वेळवंडी - कानंदी - गुंजवणी नद्यांच्या खो~याच्या बेचक्यात मुरूंबदेवाच्या डोंगरावर हा गड उभा आहे. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या या गडाने तब्बल २३ वर्षे हा मान बाळगला. तीन नैसर्गिक माच्या व कठिण बालेकिल्ला यामुळेच हा गड बेलाग आहे.


माथेरानसारख्या गर्दीच्या ठिकाणाहून थोडे बाजूला असलेला पेब हा सूंदर गड निसर्ग्प्रेमींसाठी नक्कीच एक सुखद बदल आहे. इथे असणारी नैसर्गिक गुहा तसेच गुहेसमोरचे द्रुश्य हे शब्दांत वर्णने अवघड आहे. गड चढताना जंगल मात्र थोडेसे घनदाट आहे. वरून दिसणारे सुर्योदय व सुर्यास्त मी कधीच विसरनार नाही.


रायगड ही छत्रपतींची राजधानी. महाडपासून २५ किमीवर असणारा हा गड विस्ताराने बराच मोठा आहे. व चांगल्या प्रकारे जतनदेखील केला गेलेला आहे. याच गडावर छत्रपतींची समाधीदेखील आहे. इथून चहूबाजूंना दिसनारे सह्याद्रीचे अक्राळ-विक्राळ रूप पाहून हबकून जायला होते. छत्रपतींच्या पावन स्पर्शामूळे या गडास एका देवस्थानाचा दर्जा आहे.


पुण्यापासून ३० किमी अंतरावर असणारा सिंहगड हा दुरदर्शनच्या मनो~यामुळे चटकन लक्षात येतो. या गडावर घडलेला तानाजी मालुसरेचा इतिहास ऐकून गहिवरून येते. आज मात्र हा गड अगदी विषन्न अवस्थेत आप्ल्या शेवट्च्या घटका मोजत आहे.


महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यामध्ये सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणजे मल्हारगड. पुण्यापासून जवळच असणारा हा किल्ला साधारनतः त्रिकॊणी असून आतील बालेकिल्ल्यास चौकोनी आकाराचा तट आहे. तटबंदी व बुरूजाची काही प्रमाणात पडझड झाली असली तरी ब~याच प्रमाणात ती शाबूत आहे. जवळच असणा~या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' असेही म्हटले जाते.


कोयना नदीच्या खो~यात घनदाट वनराजींमध्ये लपलेले दुर्गरत्न म्हणजे वासोटा. वाघांच्या सानिध्यामुळे या गडाला व्याघ्रघड असेही म्हटले जाते. या गडावरून दिसणारे कोयना पाणलोट क्षेत्राचे सौंदर्य अगदी अवर्णनीय आहे. तसेच नव्या व जुन्या वासोट्याच्या मध्ये असणार्या बाबुकडा या कडेवरून येणारा प्रतिध्वनी अनुभवायलाच हवा.


एखाद्या गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा उत्तम नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतुहलजनक तर भूगोल विस्मयजनक आहे. कोकणगडा हा या गडाचा सर्वात विस्मयजनक भाग. १.४ किमी उंच व १.४ किमी त्रिज्या असणारा हा अंतर्वक्र कडा हा कोकणातून वाहणा~या वा~यामुळे तयार झालेला आहे. इथे उभे राहून भन्नाट वा~याचा अनुभव घेतल्यानंतर हा आयुष्यातला सर्वोच्च बिंदू वाटेल.


भोरपासून अगदी जवळ असलेला रोहिडा हा छोटासा किल्ला २ तासांत पाहून होतो. गडावरून दिसणारे राजगड व येसाजी कंक तलावाचे मनोहारी दर्शन मनाला आनंद देऊन जाते.




छत्रपतींचे जन्मस्थान असलेला शिवनेरी हा किल्ला चढायला अगदी सोपा आहे. ऐतिहासिक द्रुष्ट्या महत्त्वाचा असल्याकारणाने हा सुंदर किल्ला ब~याच प्रमाणात संरक्षित केलेला आहे. जुन्नर शहरात प्रवेश करताच हा किल्ला दिसू लागतो. अशा या सुंदर गडाचा सहवास मात्र मला अगदी अल्प वेळ लाभला.

या प्रत्येक ठिकाणाबद्दल मी पुढे विस्ताराने लिहिणारच आहे. अपेक्षा आहे आपल्याला आवडेल. आपल्या प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत...

0 comments: